विलासराव रोहीले
पुणे | आपले राज्य डॉट कॉम
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांमध्ये केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विशेष जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक तथा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
आषाढी वारी मार्गावर लाखो वारकरी सहभागी होत असल्याने या संधीचा उपयोग करून केंद्र शासनाच्या विविध योजना, सामाजिक संदेश आणि जनजागृतीपर माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या विशेष चित्ररथामागे आहे.
वारी मार्गावर हा चित्ररथ विविध ठिकाणी थांबून माहितीपर प्रदर्शन, ध्वनीप्रसारण, लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहे. तसेच स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, डिजिटल सेवा आणि विविध शासकीय योजनांबाबत जनजागृती केली जाणार आहे.
आषाढी वारीसारख्या आध्यात्मिक सोहळ्याच्या माध्यमातून समाजोपयोगी संदेश लाखो वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. जनजागृतीसह शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्रीय संचार ब्यूरोचा हा विशेष चित्ररथ वारी मार्गावर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.